पुणे, १४ फेब्रुवरी २०२१: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात ताळेबंदी लावण्यात आली होती. या दरम्यान विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे मंदिर म्हणजेच विद्यापीठ व महाविद्यालय देखील बंद असल्या कारणाने विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने शिक्षण देण्याची पर्यायी व्यवस्था उभी करण्यात आली आणि गेल्या ११ महिन्यापासून विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत आहेत.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘ऑनलाईन’ हा जरी पर्याय असला तरी देखील त्यावर प्रभावीपणे विद्यार्थ्यांना निर्भर राहत येत नाही असे समजून आले आहे. तसेच देशात सर्व पूर्ववत झाले आहे, सर्व बाजारपेठा, वाहतूक व्यवस्था, चित्रपट गृहे, हॉटेल सुरू झालेत आणि आता कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर मागील ११ महिन्यांपासून महाराष्ट्र राज्यातील बंद असलेली विद्यापीठे, महाविद्यालये ही १५ फेब्रुवारी पासून सुरू होत आहेत.
महाविद्यालय सुरू होत असल्यामुळे शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात विद्यार्थ्यांच्या आगमनाची सुरुवात ही झाली आहे. वर्षभराच्या ‘ब्रेक’ नंतर पुन्हा महाविद्यालयात येण्यासाठी विद्यार्थी उत्सुक आहेत, विशेषतः अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक (प्रॅक्टिकल्स) महत्वाची असतात आणि यावर प्लेसमेंट्स मिळत असल्याने विद्यार्थ्यांच्या करीयर च्या दृष्टीने महाविद्यालय सुरू होणे गरजेचे होते.
गेल्या ११ महिन्यानंतर महाविद्यालयात विद्यार्थी शिकायला येणार आहे म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे महानगराच्या वतीने या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयात स्वागत करण्यासाठी “नमस्ते स्टुडंट्स – चलो कॉलेज अगेन” अभियान पुणे शहरातील महाविद्यालयात १५ फेब्रुवारी पासून आयोजित करण्यात येत आहे, या अभियानाच्या माध्यमातून अभाविप कार्यकर्ते सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन स्वागत करतील तसेच विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी संवाद साधणार आहेत.
“कॉविड च्या दरम्यान पुणे शहरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडवण्यासाठी, फूड किट्स – जेवणाचे डबे, विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिर, स्क्रिनिंग करण्यासाठी अभाविप चे कार्यकर्ते कॉविड च्या दरम्यान रस्त्यावर उतरून समाज कार्य करीत होते, तसेच विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक समस्यांना घेऊन अभाविपने आंदोलनं ही केली.
आता ११ महिन्यानंतर महाविद्यालय सुरू होत आहेत म्हणून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी ” नमस्ते स्टुडंट्स ” या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे, तसेच वसतिगृह पूर्ण क्षमतेने सुरू करावीत या साठी ही अभाविप काम करत आहे, सर्व चांगल्या-वाईट काळात विद्यार्थ्यांच्या सोबत उभं राहण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते प्रयत्न करत आहोत.” असे मत अभाविपचे पुणे महानगर मंत्री शुभम भुतकर यांनी व्यक्त केले.
न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड