‘कुणी आरे केलं तर कारे करा, एक मारली तर चार मारा’; कृषिमंत्री सत्तारांचा अजब सल्ला

मुंबई, २५ सप्टेंबर २०२२ : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार आपल्या परभणीतील भाषणामुळं चर्चेत आले आहेत. कुणी आरे करत असेल तर त्याला कारे करा एक मारली तर त्याला चार मारा अशा शब्दांत त्यांनी परभणीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना अजब सल्ला दिला आहे. अब्दुल सत्तारांनी या भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावरही चांगलीच टीका केली आहे. ठाकरे यांच्यावर टीका करत सत्तार यांनी म्हटलं की, ग्रामपंचायत सदस्यालाही मेजॉरिटी कळते मात्र यांना कळली नाही. हे फक्त निवेदन घेऊन मागे द्यायचे. आत्ताचे मुख्यमंत्री निवेदन घेऊन प्रश्न सोडवतात, अशी टीका करत येणाऱ्या काळात आमच्याकडे अजून दोन-तीन खासदार आणि पाच-सहा आमदारही येणार असल्याचा गौप्यस्फोटही सत्तार यांनी केला आहे.

हिंदू गर्व गर्जना यात्रेनिमित्त राज्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार परभणी दौऱ्यावर होते. यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. सत्तार यांनी म्हटलं की, भाजपबरोबर निवडणुका लढवल्या. त्यांचे फोटो वापरून निवडणूक जिंकल्या. मात्र यांनी सरकार दुसऱ्यांसोबत स्थापन केले. आमदार, खासदार सर्वजण सांगत असताना त्यांचं कुणीही ऐकलं नाही, असं सत्तार यांनी म्हटलं आहे. ग्रामपंचायत सदस्याला ही मेजॉरिटी कळते मात्र यांना कळली नाही. त्यामुळेच आम्ही यांना सोडून गेलो. तेव्हा हे फक्त निवेदन घेत होते आणि मागच्यांना देत होते. त्यामुळे आमचे प्रश्न सुटले नाहीत. आता एकनाथ शिंदे आणि आम्ही सर्वजण निवेदन स्वीकारून ते सोडवण्याचं काम करत आहोत, असं सत्तार यांनी म्हटलं आहे.

अब्दुल सत्तार म्हणाले की, येणाऱ्या काळातही आमच्याकडे चार-पाच आमदार आणि दोन तीन खासदारही येणार आहेत. शिवाय शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना जर कोणी धमकावत असेल तर त्याला आरेला कारे करा एक मारली तर चार मारा तसेच अधिकारी जर सामान्य शिवसैनिकांचं काम करत असतील तर ते त्यांच्यावर उपकार करत नाहीत, तर ते त्यांचं कर्तव्य असल्याचं ही सत्तार यांनी यावेळी सांगितलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा