मुंबई १६ जून २०२३ : आगामी लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्ष वेगाने कामाला लागले आहेत. काँग्रेसनेही राज्यात जागांची चाचपणी करायला सुरुवात केलीय. मुंबई अध्यक्ष बदलल्यानंतर काँग्रेसमध्ये आता प्रभारी बदलण्याची त्याच बरोबर प्रदेशाध्यक्ष बदलण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यासाठी पुन्हा एकदा नेत्यांच्या दिल्लीवारी सुरू झालेल्या आहेत. नाना पटोले गेले दोन दिवसांपासून दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जरी दावा केला असला तरी ही अद्याप पक्षाअंतर्गत सुरु असलेले वादविवाद संपलेल नाही. यासाठी काँग्रेस नेत्यांच्या दिल्लीवारी सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासह विदर्भातील अनेक नेत्यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या गाठीभेटी घेतल्या होत्या, आता पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दोन दिवसांपासून दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत.
नाना पटोले यांना अध्यक्षपदावरुन हटवा, यासाठी काँग्रेसच्या विदर्भातील काही नेत्यांनी दिल्लीमध्ये जाऊन तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर दोन दिवस स्वतः अशोक चव्हाण हे दिल्लीमध्ये ठाण मांडून बसले होते. त्यानंतर नाना पटोले यांच्या काही समर्थकांनी दिल्लीमध्ये जाऊन नाना पटोले यांची बाजू लावून धरली. आता पुन्हा एकदा दोन दिवसापासून नाना पटोले दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत. काही दिवसातच हा तिढा सुटेल असे काँग्रेसच्या आतील सूत्रांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर