अहमदनगर, २ ऑगस्ट २०२३ : भंडारदारा, गोदावरी आणि मुळा धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन तातडीने सोडण्याच्या सूचना, महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. मंत्री विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन भंडारदरा, निळवंडे, गोदावरी, मुळा धरणातील पाण्याची सधस्थिती जाणून घेतली. या प्रसंगी जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता महेश आमले, कार्यकारी अभियंता सोनाली शहाने, अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता सायली पाटील, कैलाश ठाकरे अन्य अधिकारी उपस्थितीत होते.
अनेक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे, बहुतांशी भागातील पाण्याची मागणी वाढत असल्याचे मंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन आवर्तन सोडण्याचे विभागाने तातडीने करावे असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. धरणाच्या लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन हेच आवर्तन शेतीसाठी सुध्दा कायम करता येईल याबाबतही अधिकाऱ्यांनी प्राधान्याने विचार करावा, अशी सुचना या बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी दिल्या आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर










































