कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३२वा दीक्षांत समारंभ उत्साहात

जळगाव १ मार्च २०२४ : जगातील तिसरी आघाडीची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने भारताची प्रगती ही विद्यापीठे, शिक्षक, संशोधक आणि नवकल्पना, उद्योजकता यावर अवलंबून आहे. त्यामुळे पदवीधर विद्यार्थ्यांनी स्टार्टअप सुरू करून नोकरी देणारे व्हा असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैंस यांनी  केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३२वा दीक्षांत समारंभ गुरूवार,२९ फेब्रुवारीला झाला. या समारंभात दूरदृश्य प्रणालीद्वारे अध्यक्षीय भाषण करतांना कुलपती बैस बोलत होते. यावेळी असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीच्या सरचिटणीस डॉ. श्रीमती पंकज मित्तल यांचे दीक्षांत भाषण झाले. यावेळी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे तसेच व्य.प. सदस्य यांची उपस्थिती होती.

श्री. बैस यांनी या विद्यापीठाकडून अपेक्षा व्यक्त करतांना सांगितले की, राज्य सरकारच्या प्रयत्नांच्या अनुषंगाने लहान गटातील विद्यापीठांना प्रोत्साहन दिले पाहिजे. या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना उद्योजक आणि नवोन्मेषक बनण्यासाठी प्रोत्साहीत करावे, आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, गाव दत्तक प्रकल्पांद्वारे विद्यार्थ्यांना सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी करून घ्यावे आणि माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून विद्यापीठाच्या वाढ आणि विस्तारात सहभागी करून घ्यावे. असे आवाहन त्यांनी यावेळी केले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यात आले आहे. त्यामुळे चांगल्या परदेशी विद्यापीठांशी विद्यापीठाने भागिदारी करावी. कृत्रिम बुध्दीमत्ता आणि मशिन लर्निंगच्या युगात आपण जगत आहोत. त्यामुळे आरोग्य सेवा व शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुध्दिमत्तेमुळे व्यापक परिवर्तन होणार आहे. त्यामुळे कृत्रिम बुध्दिमत्तेचा फायदा तोट्यांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली पाहिजे. विद्यापीठाच्या वाटचालीविषयी कौतुक करतांना श्री. बैस म्हणाले की, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा लाभ मिळावा यासाठी विद्यापीठ सातत्याने प्रयत्न करीत आहे याचा आनंद आहे. नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यात हे विद्यापीठ अग्रेसर आहे. विद्यापीठाचे माजी विद्यार्थी मोठ्या पदांवर कार्यरत आहे. ही अभिमानाची बाब आहे. कुलपती बैस यांनी नंदुरबारच्या रावळापाणीचा उल्लेख करीत या भागातील आदिवासी क्रांतीविरांनी इंग्रजांचा निषेध केला होता. ज्यात गोळीबार होवून अनेक आदिवासी बांधव शहीद झालेत. त्यांना वंदन करत असल्याचे सांगीतले.

बहिणाबाई चौधरी यांचे नाव विद्यापीठाला देण्यात आले आहे. त्यांना स्वत:ला शाळेत जाण्यासाठी संधी मिळाली नाही मात्र त्यांचे विचार, जीवनाचे तत्त्वज्ञान आणि त्यांच्या कवितांमुळे त्यांच्या लेखनावर अनेक पीएच.डी. झालेत. त्यावरून त्यांच्या विद्धतेची कल्पना येते असल्याचा उल्लेखही कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी केला. मंचावर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेंद्र नन्नवरे,प्रा. अनिल डोंगरे, प्रा. साहेबराव भूकन, प्रा.सतीश कोल्हे, प्राचार्य संजय सुराणा, प्रा शिवाजी पाटील, प्रा सुरेखा पालवे, नंदकुमार बेंडाळे, ॲड.अमोल पाटील, नितीन झाल्टे, प्रा महेंद्र रघुवंशी, डॉ.पवित्रा पाटील, डॉ.संजय ठाकरे, सीए रवींद्र पाटील हे उपस्थित होते. या समारंभात कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते सुवर्णपदके वितरित करण्यात आली. सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थी पालकांसह मंचावर पदक घेण्यासाठी हजर होते. सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांची नावे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा.योगेश पाटील यांनी घोषित केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रफिक शेख व डॉ. विना महाजन यांनी केले. 

या समारंभासाठी एकुण १९७१६ हजार विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली. यामध्ये, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे ७९९१ स्नातक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे ३३३८ स्नातक, मानवविज्ञान विद्याशाखेचे ४०४२ आणि आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे १२३५ स्नातकांचा समावेश आहे. या शिवाय स्वायत्त असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ३९०, मुळजी जेठा महाविद्यालयाचे १२८८ प्रताप महाविद्यालयाचे ७१६ जी.एच.रायसोनी इन्स्टीट्युट ऑफ बिझीनेस मॅनेजमेंटचे ७१२ विद्यार्थ्यांना देखील पदवी बहाल करण्यात आली. गुणवत्ता यादीतील 118 विद्यार्थ्यांना या समारंभात सुवर्णपदक देण्यात आले.यामध्ये ७७ विद्यार्थिनी व ४४विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच एक सुवर्णपदक समान गुणांमुळे तीन विद्यार्थ्यांना विभागून देण्यात आले. या समारंभात २०५ पीएच.डी. धारक विद्यार्थ्यांनी देखील पदवी घेतली.

न्युज अनकट प्रतिनिधी : पंकज पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा