दिल्ली २१ फेब्रुवारी २०२५ : तब्बल सात दशकांनी देशाची राजधानी दिल्ली येथे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होतंय. या संमेलनासाठी मराठी सारस्वतांची मांदियाळी दिल्लीत जमली असून देश व विदेशातील साहित्य रसिकही मोठ्या संख्येने पोहोचत आहेत.दुपारी ३.३० वाजता विज्ञान भवनात संमेलनाचे पहिले उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणारे मोदी हे नेहरूंनंतरचे दुसरे पंतप्रधान आहेत .
यावेळी मंचावर संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार व प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असणारेत. परंतु. इतक्या राजकीय गर्दीतही एक चेहरा मात्र हरवला आहे. तो चेहरा म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरीं यांचा. दिल्लीतला प्रमुख मराठी नेता अशी गडकरींची ओळख. मराठी भाषेच्या विकासासाठी अनेक शासकीय शासकीय चौकट ओलांडून सहकार्य केल्याच्या अनेक उदाहरणांची नोंद गडकरींच्या नावावर आहे.
पण, मग असे काय घडले की, दिल्लीत संमेलन होत असतानाही गडकरी कुठेच का नाहीत? उद्घाटनीय सत्रात गडकरींचे नाव नाही. दिसन दिवसातील विविध सत्रांमध्येही गडकरी कुठेच नाहीत. जाहिरात राज्य सरकारची असली तरी दिल्लीतला प्रमुख मराठी चेहरा म्हणून गडकरींना या जाहिरातीत स्थान देता आले असते. पण, तसे काही घडलेले नाही. आयोजकांनी गडकरींना निमंत्रण दिल्याचे कळते. पण, गडकरींनी ते का स्वीकारले नाही, हा कोडयात टाकणारा प्रश्न उपस्थित झालाय.
न्यूज अनकट प्रतिनिधी, पूनम सुपेकर – जठार