Alandi Dnyaneshwar Palakhi Departure Preparations 2025: श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदीतही प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. उद्या (गुरुवारी) माऊलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून, पोलीस प्रशासनाने शहरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. शहराच्या प्रमुख चौकांमध्ये पोलीस मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत आणि मंदिरात भाविकांसाठी माऊलींच्या दर्शनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
आषाढी वारीनिमित्त आळंदी शहरात २४ तास एक हजाराहून अधिक पोलिसांचा खडा पहारा तैनात करण्यात येणार आहे, ज्यात बॉम्ब शोधक आणि नाशक पथकांचाही समावेश आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी दिली. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाकडून २ पोलीस उपायुक्त, ३ सहायक पोलीस आयुक्त, १६ पोलीस निरीक्षक, ५९ पोलीस उपनिरीक्षक, ८०० पोलीस अंमलदार, ३५० होमगार्ड आणि वाहतूक अंमलदार यांचा समावेश असलेली मोठी टीम तैनात करण्यात आली आहे. तसेच, एसआरपीएफ, एनडीआरएफच्या तुकड्या आणि बीडीडीएसचे पथकही मदतीला पाचारण करण्यात आले आहे.
स्वच्छतेसाठी देहूत १२०० तात्पुरती स्वच्छतागृहे उभारण्यात आली असून, स्वच्छता आणि पाण्याची उपलब्धता याची नियमित देखरेख केली जात आहे. इंद्रायणी नदीच्या घाटावर चोवीस तास कार्यरत राहणारी एनडीआरएफची तुकडी आणि जीवरक्षकही तैनात करण्यात आले आहेत. मुख्य मार्गावर आणि मुक्कामस्थळी एकूण ४२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, ज्यामुळे सुरक्षिततेची खात्री पटते.
भाविकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली असून, पीएमपीएमएल आणि एसटी बससेवेद्वारे आळंदी, मनपाभवन, निगडी आणि देहूरोडकडे जाण्याची सुविधा उपलब्ध आहे. दर्शन रांगा शिस्तबद्ध राहाव्यात यासाठी नियोजनबद्ध मार्ग तयार करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेकडून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची सोय करण्यात आली असून, आरोग्य विभागाने अधिकृत टँकरवरूनच पाणी घेण्याचे आवाहन केले आहे. विविध अन्नदान मंडळांमार्फत हजारो वारकऱ्यांसाठी मोफत अन्नदान सुरू आहे.
देहू आणि आळंदी दोन्ही ठिकाणी पालखी सोहळ्यासाठी प्रचंड उत्साह आणि भक्तीमय वातावरण असून, प्रशासन आणि स्वयंसेवकांच्या अथक प्रयत्नांमुळे वारी सुरक्षित आणि सुकर होण्यास मदत मिळणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे