पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) चाकण परिसरातील गंभीर वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘मिसिंग लिंक’ (अपूर्ण रस्ते) शोधून ते विकसित करण्यासाठी पहिल्या टप्प्यात मेदनकरवाडी, कडाचीवाडी, खराबवाडी आणि नाणेकरवाडी या चार गावांमध्ये भूसंपादन करण्यात येत आहे. या निर्णयामुळे चाकणमधील वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार कार्यवाही
चाकण परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी या भागाची पाहणी केली होती. त्यांच्या सूचनेनुसार, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी अपूर्ण रस्त्यांचा अभ्यास करून पर्याय शोधले. चाकण शहर आणि एमआयडीसीमध्ये रस्ते अरुंद असल्याने आणि पर्यायी मार्ग नसल्याने ही कोंडी वाढत होती. आता ‘मिसिंग लिंक’ जोडून नवीन ‘रिंगरोड’ तयार करण्याचे नियोजन आहे.
भूसंपादनाचे काम प्रगतीपथावर
या प्रकल्पासाठी मेदनकरवाडी, कडाचीवाडी, नाणेकरवाडी आणि खराबवाडी येथे रस्त्यांसाठी जमीन संपादन केली जात आहे. यासाठी ४ ऑगस्ट रोजी जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, आळंदी फाटा ते रासे फाटा दरम्यान एक नवीन बायपास मार्ग प्रस्तावित आहे. यामुळे शिक्रापूरकडे जाणाऱ्या वाहनांना चाकण चौकातून जाण्याची गरज राहणार नाही, ज्यामुळे चौकातील वाहतूक कोंडी लक्षणीयरित्या कमी होईल. खेड उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत हे भूसंपादन केले जाणार आहे. या सर्व उपाययोजनांमुळे चाकणच्या वाहतुकीला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे










































