छत्रपती संभाजीनगर:- १९ मार्च रोजी सकल हिंदू एकत्रीकरण समितीच्यावतीनं हिंदू जन गर्जना मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चा मध्ये आमच्या बौद्ध समाजाचे निळे झेंडे मोर्चाच्या ठिकाणी, रस्त्यावर इतर ठिकाणी फेकून दिल्याचं दिसून आलंय. म्हणून आमच्या समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. म्हणून कालच्या मोर्चाच्या आयोजकावर जातीय भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आंबेडकरी संघटनेकडून करण्यात येत आहे. या आयोजकांवर जातीय भावना दुखावल्या गेल्यानं त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं क्रांती चौक पोलिस स्टेशनला निवेदनाद्वारे करण्यात आलीय. यावेळी संजय कडुबा सातपुते ( जिल्हाध्यक्ष), सर्जेराव मनोरे ( मराठवाडा प्रदेश अध्यक्ष), अनिल मगरे ( मराठवाडा संघटक), पंचशील खोब्रागडे (महिला जिल्हाध्यक्ष), रणजित साळवे (शहर अध्यक्ष) सह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं की, हिंदू जन गर्जना मोर्चानं संभाजीनगर शहराच्या नामांतरांच्या सन्मानार्थ क्रांतीचौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. संबंधीत मोर्चात भगवे तसेच निळे ध्वज मिरवण्यात आले होते. बरेचशे निळे ध्वज जे की आंबेडकरी समाजाचे प्रतिक व आस्मिता आहे. हे निळे ध्वज जमिनीवर मातीत झोकुन देण्यात आले.
तशा प्रकारचा व्हिडीओ समाज माध्यमांवर फिरत असुन यामुळं आंबेडकरी तसेच बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. हे कृत्य आयोजकांकडून जाणून-बुजून केल्याचं प्रथम दर्शनी निदर्शनास येत आहे. त्यामुळं या मोर्चाच्या आयोजकांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येते.
भीमशक्ती सामाजिक संघटनेकडून कारवाईची मागणी:-
बौद्ध समाजाचे निळे झेंडे हे रस्त्यावर फेकण्यात आल्यानं आंबेडकरी संघटनांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. निळा झेंडा आम्हाला बाबासाहेबानी दिलाय. ते आमच्या अस्मितेचं प्रतीक आहे. त्यामुळं आंबेडकरी समाजाच्या भावना दुःखावल्या म्हणुन अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पोलिसांकडं विविध आंबेडकरी संघटनेकडून करण्यात येत आहे.
यामुळं पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. या मोर्चाला पोलिसांची परवानगी नसतानाही हा मोर्चा काढण्यात आला, या वेळी प्रक्षोभक भाषणे केल्यामुळं आमदार राजासिंह ठाकूर, पत्रकार सुरेश चव्हाणके यांच्यासह आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मोर्चावेळी काही उपोषण कर्त्यांकडून औरंगाबाद अश्या नामफलकावर दगडफेक, तोडफोड केली. त्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी: विनोद धनले













































