मुंबई, ९ नोव्हेंबर २०२०: अर्णव गोस्वामी हे नाव गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वादाचं कारण राहिलं आहे आणि या नावाभोवती राजकारण देखील फिरत राहिला आहे. काही दिवसांपूर्वी अर्णव गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक झाल्यानंतर त्यांची रवानगी थेट तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. अर्णव यांना अटक केल्यामुळं भाजपने तीव्र संताप व्यक्त केला असून भाजप नेते आणि कार्यकर्ते या अटकेच्या निषेधार्थ रोज आंदोलन करत आहेत. भाजपचे नेते राम कदम देखील यात सक्रिय राहिले आहेत. दोन दिवसांपूर्वी राम कदम यांनी मंत्रालयासमोर उपोषण सुरू केलं होतं. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागं घेतलं.
त्यात आता राम कदम यांनी अर्णब गोस्वामी याला भेटण्यासाठी तळोजा कारागृहात जाण्याची तयारी केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राम कदम यांनी महाविकास आघाडी सरकारला आव्हान देत हिंमत असेल तर मला अडवून दाखवा असं म्हटलं आहे.
राम कदम यांनी हिंदीमध्ये ट्विट करत ठाकरे सरकारला याबाबत चेतावणी दिली आहे. ते म्हणाले की, “अर्णव गोस्वामी च्या केसाला जरी धक्का लागला तर त्यास राज्यसरकार पूर्णपणे जबाबदार असंल. तसंच या देशातील जनता देखील तुम्हाला माफ करणार नाही. राज्य सरकारनं अर्णव गोस्वामी यांच्यावर जबरदस्तीनं आरोप लावले आहेत.” दरम्यान आज दुपारी तीन वाजता अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे











































