मुंबई, २० मे २०२३: नागरिक आपल्या सुचना व तक्रारी शासनाशी संबंधित विविध समाज माध्यमातून मांडत असतात. अशावर तत्काळ कार्यवाही होण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे आपले सरकार आणि मुख्यमंत्री सचिवालय अशी संयुक्त यंत्रणा उभारण्यात येत असून ती त्वरित कार्यन्वित करण्याची सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
सह्याद्री अतिथीगृह येथे माहिती तंत्रज्ञान विभागाच्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासंदर्भात बैठक पार पडली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव पराग जैन आणि माहिती तंत्रज्ञान संचालक जयश्री भोज यांनी यासंदर्भात सादरीकरण केले. नागरिक पारंपरिक पद्धती व्यतिरिक्त ईमेल, ट्विटर, फेसबुक इन्स्टाग्राम तसेच इतर नागरिक माध्यमातून शासनाकडे तक्रारी पाठवत असतात.
त्यावर कार्यवाही होण्यासाठी संबंधित विभागांना त्या पाठवणे, पाठपुरावा तसेच नागरिकांना याविषयी माहिती मिळत राहणे गरजेचे आहे, माहिती तंत्रज्ञान विभाग हा आपले सरकार टीमच्या मदतीने ही यंत्रणा उभारत असून ती लवकर कार्यान्वित करावी जेणेकरून नागरिकांना त्यांचा उपयोग होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर










































