पुणे, दि. २० मे २०२०: राज्यातील लॉकडाऊनची एकूण परिस्थिती पाहता अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे. अशा परिस्थितीत उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणावर चालना देणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील याला अनुसरून नुकतीच नवीन नियम जारी केले आहेत. बेरोजगारी आणि उद्योग धंद्यांना भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेत पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते नाना वाळके यांनी मुख्यमंत्र्यांकडे याविषयी काही मागण्या केल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ट्विटर अकाउंट वर त्यांनी अशा स्वरूपात एक ट्विट देखील केले आहे. काय आहेत त्यांच्या मागण्या जाणून घेऊया.
• नवीन उद्योगधंद्यांना चालना देणे तसेच सवलती देणे
नुकतेच उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील उद्योग धंदे यांविषयी नवीन नियम जारी केले आहेत. त्यांनी या गोष्टींचा त्यामध्ये उल्लेख देखील केला आहे. परंतू नाना वाळके यांच्या मते प्रत्यक्षात नवीन उद्योग धंदे सुरू होताना सरकारी प्रक्रियेमध्ये भरपूर वेळ जातो. तसेच यामध्ये काही अधिकाऱ्यांची मनमानी देखील होत असते. देशाबाहेरून राज्यात नवीन उद्योग येत असले तरी सरकारने या उद्योग नोंदणीसाठीच्या ज्या प्रक्रिया आहेत त्यामध्ये अधिकार्यांकडून कोणतीही मनमानी होणार नाही याकडे लक्ष द्यायला हवे. कारण या प्रक्रियांमध्ये जेवढा वेळ जाईल तेवढाच वेळ महाराष्ट्रात नवीन उद्योगधंदे येण्यास लागेल. परिणामी नवीन रोजगार उपलब्ध होण्यास देखील विलंब होणार आहे.
• लाईट, रस्ते, पाणी या मूलभूत सुविधा त्वरित उपलब्ध कराव्यात
याबाबत नाना वाळके यांचे असे मत आहे की, राज्य सरकारने जरी परदेशातून येणाऱ्या कंपन्यांना महाराष्ट्रात येण्यास आव्हान केले असले तरी औद्योगिक विश्वासाठी महत्त्वाच्या पायाभूत सुविधा म्हणजे लाईट, रस्ते, पाणी या उपलब्ध असणे गरजेचे आहे. उद्धव ठाकरेंनी ४०,००० एकर जमीन उद्योगधंद्यासाठी आरक्षित ठेवली आहे असे सांगितले होते. इतका मोठा भाग उद्योगांसाठी आरक्षित ठेवला आहे त्याबरोबरच या भागात उद्योगधंद्यात पूरक सर्व पायाभूत सुविधा असणे आवश्यक आहे. अन्यथा अशा उद्योगधंद्याची उभारणी करणे एक अडचणीची प्रक्रिया ठरू शकते.
• कंपन्यांना करांमध्ये सूट द्या
लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वच उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. अर्थव्यवस्थेत द्रव्यात कमी असल्यामुळे नवीन उद्योग सुरू करताना देखील मोठ्या अडचणी येत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने पहिल्या दोन वर्षांसाठी कंपन्यांकडून कोणतेही कर घेऊ नये. उद्योगधंदे १००% कार्यक्षमतेने चालू लागल्यास सरकारने कर वसूल करण्यास सुरुवात करावी. यामुळे अशा अडचणीच्या काळात देखील नवीन कंपन्या उभ्या राहण्यास हातभार लागेल. राज्य सरकारने या गोष्टीचा विचार देखील केला आहे आणि काही सवलती देखील उद्योगधंद्यांना देण्यात आले आहेत यासाठी त्यांनी राज्य सरकारचे आभार देखील मानले आहे.
• महाराष्ट्रातील तरुणांसाठी रोजगार विषयक संकेतस्थळ बनवावे
राज्य सरकारने असे एक संकेतस्थळ (वेबसाईट) बनवावे जिथे सरकारी आणि खाजगी दोन्ही प्रकारचे रोजगार उपलब्ध असतील. सध्या सरकारमधील वेगवेगळ्या विभागांसाठी वेगवेगळे संकेतस्थळ आहे. त्यामुळे सरकारी नोकऱ्या केव्हा येतात आणि त्यांच्या तारखा केव्हा संपून जातात हे तरुणांपर्यंत पोहचत देखील नाही. याच बरोबर रज्या मधील मोठ्या कंपन्यांमध्ये देखील भरती सुरू असते परंतू असे संदेश सोशल मीडिया किंवा इतर खाजगी संकेतस्थळांवर फिरत असतात ते प्रत्येक जणांपर्यंत पोहचेल असे नसते. या सर्व रोजगार विषयक सरकारी व खाजगी संधी एकाच संकेतस्थळावरती उपलब्ध झाल्यास युवकांना याचा नक्कीच फायदा होईल. हे संकेतस्थळ सरकारने स्वतःच्या ताब्यात ठेवून त्याचे कामकाज पहावे.
• नोकऱ्यांमध्ये मराठी भाषा येणाऱ्यांना ६०% टक्के आरक्षण ठेवावे
हा मुद्दा नेहमीच उठत राहिला आहे. परंतु प्रत्यक्षात यावर कोणत्याही सरकारने पावले उचललेली नाहीत. राज्यातील तरुणांना रोजगारामध्ये प्राधान्य मिळण्यास या नियमाचा फायदा होऊ शकतो. याच बरोबर राज्यात प्रचलित असलेली मराठी भाषा सर्वांसाठी सोयीस्कर असल्याने त्याचा देखील फायदा होईल. केवळ मराठी भाषा किंवा मराठी तरुण इथपर्यंतच हे सिमीत न राहता सरकारने राज्यातील तरुण पिढीला औद्योगिक प्रशिक्षणासाठी जास्तीत जास्त शाखा उपलब्ध करून द्याव्यात. महाराष्ट्राला प्रोडक्शन हब बनवायचे असेल तर त्या गुणवत्तेचे प्रशिक्षण देखील तरुणांना मिळणे आवश्यक आहे. सरकारने त्या दिशेने देखील पाऊल उचलणे गरजेचे आहे.
• माथाडी बंद करा
राज्यात ठिकठिकाणी माथाडीच्या शाखा आहेत परंतू प्रत्यक्षात तिथे किती माथाडी कामगार काम करत असतात हा प्रश्न आहे. माथाडी मध्ये मोठ्या प्रमाणावर राजकारणी व्यक्ती घुसत आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. स्थानिक स्तरावरती यामध्ये राजकारण होताना पाहण्यास मिळत आहे. काही ठिकाणी यावरून वाद देखील झाले आहेत. एखादा नवीन भाडेकरी आला किंवा घर खाली करत असेल तर त्याची इच्छा नसताना देखील हे लोक बळजबरीने त्यांना माथाडीचा अवलंब करण्यास भाग पडतात.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे










































