न्यूज अनकट प्रतिनिधी, भागा वरखाडे
बिहार विधानसभेच्या निवडणुका चार-पाच महिन्यांत होणार आहेत. त्यासाठी राजकीय पक्षांनी व्यूहरचना सुरू केल्या आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत निवडणुकीपूर्वीच फूट पडली आहे. केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील लोक जनशक्ती पक्षाने विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे जाहीर केले आहे. त्यांचा हा निर्णय भाजपच्या सूचनेनुसार घेतला, की त्यांना मुख्यमंत्री होण्याची घाई झाली आहे, हे कळण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागेल.
LJP Leader Chirag Paswan Bihar Politics: बिहार विधानसभा निवडणुकीत लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) प्रमुख केंद्रीय मंत्री चिराग पासवान बिहारमध्ये ‘एनडीए’चा विस्तार करत आहेत, की दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत? पासवान यांनी आगामी बिहार विधानसभा निवडणुकीबाबत मोठे विधान केले. ‘एनडीए’ मजबूत करण्यासाठी ते संपूर्ण राज्यात सक्रिय भूमिका बजावतील, असे सांगताना त्यांचे तर्कशास्त्र चुकते आहे. पासवान यांनी राज्यातील सर्व २४३ जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा त्यांनी केली आहे. ‘एनडीए’च्या विरोधात निवडणूक लढवून ते ‘एनडीए’चे भले कसे करणार, या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. चिराग हे बिहारच्या राजकारणात एक उदयोन्मुख चेहरा म्हणून उदयास येत आहेत. आरा रॅलीमध्ये ‘जंगल राज’ला काँग्रेसशी जोडण्याची आणि कर्पूरी ठाकूर यांची सामाजिक न्यायाच्या कल्पना पुढे आणण्याची रणनीती केवळ त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा दर्शवत नाही, तर ‘एनडीए’चा मार्ग मोकळा करण्याचा आणि दबावाचे राजकारण करण्याचा एक जटिल खेळदेखील दर्शवते. आरा येथील सभेत चिराग यांनी बिहारमधील ‘जंगल राज’साठी काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाला जबाबदार धरले आहे. बराच काळ सत्तेत असलेली काँग्रेस सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी ठोस पावले उचलण्यात अपयशी ठरली. विशेषतः त्यांनी जातीय जनगणनेसारख्या मुद्द्यांवर काँग्रेसच्या निष्क्रियतेवर टीका केली. हे विधान केवळ काँग्रेसला कमकुवत करण्याचा प्रयत्न नाही, तर बिहारमधील मतदारांमध्ये असा संदेश देण्याचा प्रयत्न आहे, की ‘एनडीए’ हा विकास आणि सामाजिक न्यायाचा खरा वाहक आहे. ‘जंगल राज’ चा उल्लेख १९९० च्या दशकात बिहारमधील लालू प्रसाद यादव यांच्या राजवटीशी जोडला गेला आहे. हा उल्लेख कायदा आणि सुव्यवस्था आणि भ्रष्टाचारासाठी ओळखला जातो. चिराग यांनी ते काँग्रेसशी जोडणे ही एक धोरणात्मक चाल आहे. कारण काँग्रेस त्या वेळी राष्ट्रीय जनता दलाची सहयोगी होती. याद्वारे, चिराग केवळ विरोधी आघाडी (महागठबंधन) कमकुवत करण्याचा प्रयत्न करत नाहीत, तर ‘एनडीए’मध्ये त्यांची स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. बिहारमधील मतदारांना, विशेषतः तरुणांना आणि दलित समुदायांना हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे, की फक्त ‘एनडीए’च बिहारला ‘जंगल राज’ पासून मुक्त करू शकते. चिराग यांनी कर्पूरी ठाकूर यांच्या सामाजिक न्यायाच्या कल्पना वारंवार अधोरेखित केल्या आहेत. बिहारचे पहिले बिगर-काँग्रेसी मुख्यमंत्री ठाकूर हे सामाजिक समानता आणि मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी ओळखले जातात. चिराग यांनी जातीय जनगणनेचे वर्णन ठाकूर यांच्या कल्पना पूर्ण करण्यासाठी एक पाऊल म्हणून केले. त्याचे श्रेय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. ही रणनीती दुहेरी उद्देशाने कार्य करते. पहिले, ते चिराग यांना दलित आणि मागासवर्गीयांमध्ये एक मजबूत नेता म्हणून स्थापित करते, त्यांचे वडील रामविलास पासवान यांचा वारसा पुढे नेण्याचा दावा करते. दुसरे, सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर ते ‘एनडीए’ला विरोधकांपेक्षा पुढे ठेवते. त्याचा वापर राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस दीर्घकाळापासून करत आहेत.
चिराग यांची रणनीती ‘एनडीए’ला मदत करण्यापुरती मर्यादित मानली जाऊ शकत नाही. त्यांचे वक्तृत्व आणि विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा दर्शवते, की ते ‘एनडीए’मध्ये त्यांचे स्थान मजबूत करण्यासाठी आणि भविष्यात मुख्यमंत्रिपदाचा दावा करण्यासाठी मैदान तयार करत आहेत. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत चिराग यांनी संयुक्त जनता दलाच्या नितीश कुमार यांच्या विरोधात बंड केले होते. त्यामुळे संयुक्त जनता दलाचे नुकसान होऊन राष्ट्रीय जनता दलाला आणि भाजपला फायदा झाला. नितीश कुमार आणि चिराग एकाच सरकारचे घटक असले, तरी त्यांची भूमिका परस्पर विरोधी असते. नितीश कुमार यांना गेल्या निवडणुकीत चिराग यांच्यामुळे बसलेला फटका ते अजूनही विसरलेले नाहीत. भाजपच्या विरोधात उमेदवार न देता केवळ संयुक्त जनता दलाच्या विरोधात उमेदवार देण्यामागे एकट्या चिराग यांचे डोके नसावे, त्यामागे भाजपची व्यूहनीती असावी, असे सांगितले जात होते. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने लोक जनशक्ती पक्ष आणि संयुक्त जनता दलाला एकत्र आणले असले, तरी आता त्या दोघांत पुन्हा दुरावा निर्माण झाला आहे. दिल्लीत गेलेल्या नितीश कुमार यांनी मित्रपक्षापैकी कुणाचीही भेट न घेता परतण्याचा अर्थ त्यांची नाराजी हेच आहे. गेल्या निवडणुकीत कमी जागा लढवूनही भाजपला जास्त जागा मिळाल्या, तर जास्त जागा लढवूनही केवळ चिराग यांच्यामुळे त्यांच्या पक्षाला तिसऱ्या क्रमांकावर जावे लागले. आता बिहार विधानसभेच्या निवडणुकीसाठी जागा वाटप हा कळीचा मुद्दा बनला आहे. भाजप आणि नितीश कुमार यांना सारख्याच जागा हव्या आहेत. त्यात चिराग यांनी ४०-४५ जागांची मागणी केली आहे. उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षालाही जास्त जागा हव्या आहेत. जीतनराम मांझी यांच्या ‘हिंदुस्तान अवामी मोर्चा’ला वाढीव जागा हव्या आहेत. अशा परिस्थितीत जादा जागा वाटपाचा तिढा सुटणार नाही, असे वाटल्याने चिराग यांनी वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला असावा. चिराग यांच्या रणनीतीमध्ये दबावाचे राजकारण स्पष्टपणे दिसून येते. ते भाजप आणि संयुक्त जनता दलावर अधिक जागांसाठी दबाव आणत आहेत. त्यामुळे त्यांचा पक्ष, लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) बिहारमध्ये एक मजबूत शक्ती बनू शकेल. याशिवाय, ‘बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट’ विचारसरणी आणि तरुणांसाठी रोजगार असे मुद्दे उपस्थित करून, तेजस्वी यादव आणि प्रशांत किशोर सारख्या नेत्यांशी स्पर्धा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विधानसभा निवडणुकीत अधिक जागा आणि सक्रियतेची मागणी करून, ते ‘एनडीए’मध्ये दबाव निर्माण करून त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला चालना देत आहेत. ही रणनीती केवळ बिहारच्या राजकारणात त्यांची प्रासंगिकता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न नाही, तर भविष्यात मोठ्या नेतृत्वाच्या दाव्याचे संकेतदेखील देते.
चिराग यांनी विधानसभा निवडणुका लढवण्यात रस दाखवला आहे. याचा अर्थ त्यांना केंद्रात मंत्री राहण्यापेक्षा राज्याच्या राजकारणात रस आहे. त्यांनी कोणत्या विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार, हे सांगितलेले नाही. चिराग यांच्या निवडणूक लढवण्याच्या विधानानंतर, बिहारमध्ये नवीन राजकीय समीकरणे तयार होतात, की काय याबाबत चर्चा सुरू झाली आहे. बिहारमध्ये तीन दशकांहून अधिक काळ ओबीसी नेतृत्व दलित नेतृत्वाकडे वळवण्याचा प्रयत्न म्हणूनही याकडे पाहिले जात आहे. यापूर्वी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत चिराग यांना बिहार विधानसभा निवडणूक लढवण्याची मागणी करणारा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. बिहारचे नेतृत्व उच्च जाती आणि ओबीसींच्या हातात होते; पण आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप ते दलित नेतृत्वाकडे वळवू इच्छितात. बिहारमध्ये त्यांची लोकसंख्या सुमारे १९ टक्के आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या तेजस्वी यादव हेच सध्या बिहारमधील राजकारणातील युवा चेहरा आहेत. ‘एनडीए’कडे तसा एकही युवा नेता नाही. अपवाद फक्त चिराग पासवन यांचा. चिराग हे बिहारमध्ये भाजपसाठी एक चांगला पर्याय आहे. त्यांच्या भूतकाळाकडे पाहिले, तर घर, पक्ष आणि बंगला गमावल्यानंतरही ते मोदी यांचे हनुमान राहिले. चिराग यांना बिहारच्या सत्तेत रस आहे. चिराग यांनी त्यांचे वडील रामविलास जिवंत असताना ‘बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट’चा नारा दिला होता. त्यांना बिहार आवडते आणि सर्वसाधारण जागेवरून निवडणूक लढवून ते सर्वांचे आहेत, हे ते दाखवू इच्छितात. चिराग यांच्या पक्षाची संघटनात्मक रचना सर्वसमावेशक आहे. त्यांच्या पक्षात दलित, ब्राम्हण, मुस्लिम अशा सर्वंच समाजघटकांचा समावेश आहे. ते केवळ दलितांनाच नव्हे, तर इतर गटांनाही त्यांच्या राजकारणाच्या वर्तुळात आणू इच्छितात. चिराग वैशाली, नवादा किंवा हाजीपूर येथून निवडणूक लढवू शकतात; परंतु राजकीय विश्लेषकांच्या मते बिहार विधानसभेच्या सर्व जागांवर निवडणूक लढवण्याचा इशारा हा त्यांना स्वतःला बातम्यांमध्ये ठेवण्याचा आणि जागांसाठी सौदेबाजी करण्याचा प्रयत्न आहे.