पुरंदर ३० ऑक्टोबर २०२०: पुरंदर तालुक्यातील जवळार्जुन येथे उभ्या असलेल्या ट्रॉलीला धडकून काल याच गावातील सुखदेव टेकवडे या युवकाचा मृत्यू झाला. अशाप्रकारे रेडियम अगर रिफ्लेक्टर नसलेल्या अनेक ट्रॉलीज गावागावात उभ्या असतात, त्यामुळे अनेकांना अशाप्रकारे अपघाताला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर जेजुरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी प्रत्येक गावातील पोलीस पाटील यांनी याबाबत दक्षता घेऊन गावातील ट्रॅक्टर मालकांना रिफ्लेक्टर लावण्याच्या सूचना द्याव्यात व याबाबत त्यांना समज द्यावी अशा सूचना केल्या आहेत.
काल गुरुवार दि.२९ रोजी रात्रीच्या वेळी मौजे जवळार्जुन गावातील सुखदेव टेकवडे या युवकाचा रोडच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॉलीस धडकून अपघात झाला, या आपघाता मध्ये डोक्यास जबर दुखापत झाल्याने उपचारापूर्वीच तो मयत झाला. सुखदेव टेकवडे ज्या ट्रॉलीस धडकला होता, त्या ट्रॉलीस रेडियम, रिफ्लेक्टर नसल्याने अंधारात रोडच्या कडेला असलेली ट्रॉली त्यास न दिसल्याने हा अपघात झाला होता.
बहुतेक शेतकरी ट्रॉली गावाबाहेर जात नाही, ट्रॉली शेतातच वापरतो गावात किंवा शेतात पोलीस येऊन कुठे कारवाई करतात? असा समज करून घेऊन ट्रॉलीस टेल लॅम्प, रेडियम किंवा रिफ्लेक्टर बसविण्याची तसदी घेत नाहीत, त्यामुळे रात्रीच्या वेळी असे अपघात होतात.याबाबत अंकुश माने म्हणाले की, बरेच शेतकरी ट्रॉली रात्रीच्या वेळी रोडच्या कडेला लावून ठेवतात. त्यामुळे रस्त्याने येणाऱ्या वाहनचालकास समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रकाशात ट्रॉली दिसत नाही. त्यामुळे अपघात होतात. त्यामध्ये निष्पाप नागरिकांना आपल्या प्राणास मुकावे लागत आहे, यासाठी सर्व पोलीस पाटलांनी आपापले गावातील सर्व ट्रॅक्टर, ट्रॉली मालकांना ट्रॉलीस रिफ्लेक्टर, रेडियम बसविणे बाबत तसेच रोडच्या कडेला ट्रॉली पार्क करू नये याबाबत समज द्यावी. ट्रॉलीस रेडियम व रिफ्लेकटर नसल्यास तसेच ट्रॉली रोडच्या कडेला पार्क केल्यास संबंधित शेतकऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल याबाबत समज द्यावी.
न्यूज अनकट प्रतिनिधी राहुल शिंदे











































