धनुष्यबाण’ गोठवल्यानंतर सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया

मुंबई, ९ ऑक्टोंबर २०२२: निवडणूक आयोगाने धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबत मोठा निर्णय घेत हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थक गटाला दोन वेगळी चिन्हे दिली जाणार आहेत. दरम्यान, यावरून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटासह भाजपावरही टीका केली आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

“जेव्हा खुज्या लोकांच्या सावल्या लांब पडायला लागतात, तेव्हा समजून घ्यावं की अंधार जास्त पडतो आहे. हे सर्व भाजपाचे कारस्थान आहे. हे वेगळं सांगायची गरज नाही. मात्र, आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढू आणि जिंकू”, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे.

आम्ही हरलो म्हणजे तुम्ही जिंकलात असं होत नाही. डाव तुमच्या हातात असला तरी, जिंकता तुम्हाला येत नाही. मोदी-शहा जी फडणवीसजी तुम्ही जिंकलात? अभिनंदन! पण तुम्ही जिंकू शकला कारण आमच्यातल्याच फितुरांनी साथ दिली; अन्यथा तुमच्यात ती धमक नक्कीच नव्हती. पण आम्ही खडकातूनही पुन्हा उगवू, असंही अंधारे यांनी म्हटलं.

दरम्यान निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवलं असून ते रद्द केलेलं नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील निर्णय ठाकरे गटाच्या बाजुने गेल्यास धनुष्यबाण चिन्ह पुन्हा एकदा ठाकरे गटाला मिळू शकेल. पण या जर तर च्या बाबी आहेत. सध्या तरी हा निर्णय तात्पूरत्या स्वरुपाचं असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे