इतिहासाशी छेडछाड चुकीची; महाराष्ट्रातील दोन शहरांच्या नामांतरावर असदुद्दीन ओवैसी संतापले

मुंबई, २५ फेब्रुवारी २०२३ : महाराष्ट्र सरकारच्या वतीने दोन शहरांची नावे बदलल्याबद्दल ‘एआयएमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी एकनाथ शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. आमचे क्षेत्र आमची जनता ठरवेल, एकनाथ, देवेंद्र किंवा उद्धव नाही, असे ओवैसी म्हणाले. आज सरकारकडे संख्याबळ आहे, ते लोकांना विश्वासात न घेता काहीही करीत आहेत.

खरे तर महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदे सरकारने राज्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्यात आले आहे. नाव बदलण्यावर ओवैसी पुढे म्हणाले की,सरकारचे प्रयत्न तेच आहेत, ते ठिकाणे, उद्याने आणि शहरांची नावे बदलत राहतात. इतिहास चांगला असू शकतो, वाईट असू शकतो; पण इतिहास हा इतिहास असतो, त्याच्याशी छेडछाड करणे चुकीचे आहे. ते म्हणाले की, जगभरातील हेरिटेज वास्तू आपल्या औरंगाबादमध्ये आहेत. प्रत्येक स्तरावर फरक पडेल, सर्व कागदपत्रे बदलावी लागतील.

ते म्हणाले की, आम्ही यापूर्वी मोर्चा काढला होता, लोकांनी विरोधही केला होता. आज सरकारकडे संख्याबळ आहे, ते लोकांना विश्वासात न घेता काहीही करीत आहेत. ही हुकूमशाही आहे. आमचा परिसर आमची जनता ठरवेल, एकनाथ शिंदे, देवेंद्र किंवा उद्धव नाही. नाव बदलल्याने पाणी, रोजगार मिळेल का, असा सवाल ओवैसी यांनी केला. आम्ही सर्वोच्च आहोत, न्यायालयाच्या वर आहोत, असा संदेश सरकारने दिला आहे.

केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर करण्याच्या प्रक्रियेलाही मान्यता दिली आहे. नाव बदलाबाबत महाराष्ट्र सरकारच्या मागण्या केंद्र सरकारने मंजूर केल्या आहेत. त्यामुळे आता औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्यात येणार आहे. कोणत्याही राज्यात शहरांची नावे बदलण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी यूपीमधील अनेक शहरांची आणि रेल्वेस्थानकांची नावे बदलण्यात आली आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा