महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेली शिवभोजन थाळी बंद होण्याची शक्यता, या योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय

मुंबई, २६ सप्टेंबर २०२२: शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय शिंदे-फडणवीस सरकारला आहे. त्या मुळे ही योजना बंद होण्याची शक्यता आहे. ही योजना बंद झाल्यास गरजूंना मोठा फटका बसणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील जनतेला १० रूपयांत जेवण मिळत होते. कोरोना काळात याची किंमत ५ रूपये करण्यात आली होती. या योजनेमुळे गरिबांना मोठा आधार मिळत होता.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने ही शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. राज्यात एक लाख ८८ हजार ४६३ एवढ्या थाळींची विक्री होते. शिवभोजन थाळीसाठी विविध ठिकाणी केंद्र सूरू करण्यात आली आहेत.

 ही केंद्र चालवणाऱ्यांना राज्य सरकारकडून विविध मदत दिली जाते. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि  भाजप चे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यां नेतृत्वातील सरकारने कारभार हाती घेतल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात घेतलेल्या काही निर्णयांना स्थगिती दिली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सूरू झालेली शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा शिंदे सरकारला संशय आहे. आता या योजनेचा आढावा घेतल्यानंतर ही योजना चालू करायची का बंद करायची याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेणार असल्याची माहिती  सूत्रांनी दिली. 

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रकाश जगताप.