नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) वरुन देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच रविवारी रात्री जेएनयूच्या विद्यार्थ्यांना मारहाणीचे प्रकरण घडले. या पार्श्वभूमीवर ट्विटरवर सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा असा ट्रेंड सुरु झाला आहे. अशी माहिती व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे.
जेएनयूतील विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीची तीव्र पडसाद देशभरात उमटत आहे. देशभरातील विद्यार्थी या घटनेचा तीव्र निषेध करत रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. याचेच पडसाद ट्विटरवर उमटले असून नेटकऱ्यांनी अमित शहांविरोधातील ट्विटचा भडिमार केला आहे. अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरु लागली आहे.
सीएए आणि एनआरसी विरोधात रस्त्यावर उतरलेले आंदोलक आणि पोलीस यांच्यात धुमश्चक्री झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अनेक ठिकाणी हिंसाचार घडून आला होता. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात वातावरण तयार होत असून विद्यार्थ्यांकडून अमित शहा हटावची मागणी जोर धरु लागली आहे.










































