दौंड, १२ ऑक्टोबर २०२०: केंद्र सरकारने केलेले कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे कायदे आहेत. या कायद्यांना विरोध करणारे लोक हे शेतकरी विरोधी आहेत. शेतकरी गरीब रहावा असे या लोकांना वाटते. गरीब राहिलेला शेतकरी यांना निवडणुकीत पाठीमागे फिरायला मिळतो, यामुळे हे उद्योग सुरू आहेत. परंतु महाराष्ट्रातील शेतकरी सुज्ञ आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात या कायद्यांना फारसा विरोध होताना दिसत नाही, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला आहे.
नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांचे स्वागत करण्यासाठी बळीराजा सन्मान आणि ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन भाजप किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत दौंड तालुक्यातील वरवंड ते चौफुला ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. यात चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदार राहुल, वासुदेव काळे, हर्षवर्धन पाटील व भाजप नेत्यांनी ट्रॅक्टरमध्ये बसून वरवंड ते चौफुला रॅलीत सहभाग घेतला. ट्रॅक्टर रॅलीमध्ये ‘मोदी है तो मुमकीन है’, ‘कृषी विधेयक एक वरदान’ अशा आशा घोषणा लिहिलेले फलक लावण्यात आले होते. यावेळी बोलताना दौंडचे आमदार राहुल कुल यांनी सांगितले की, केंद्र सरकारने केलेल्या विधेयकामुळे शेतकऱ्यांच्या मूळ व्यवस्थेत कोणताही बदल होणार नाही. उलट या विधेयकामुळे शेतकऱ्यांना वाढीव फायदे होतील असे कुल यांनी सांगितले.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी भरघोस निधी देवेंद्र फडणवीस यांच्या काळात दिल्याबद्दल कुल यांनी भाजपचे आभार मानले. दौंड तालुक्यातून अष्टविनायक मार्गासाठी जवळपास 300 कोटींचा निधी देण्यात आला आहे. तसेच भीमा पाटस कारखाना सुरू करण्यासाठी मदत करणार असल्याची ग्वाही अमित शाह यांनी दिली असल्याची माहिती यावेळी आमदार कुल यांनी दिली. ही रॅली चौफुला येथे आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ट्रॅक्टर आणि बैल जोडीचे पूजन करण्यात आले. यानंतर रॅलीचे रुपांतर सभेत झाले. यावेळी शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच या ट्रॅक्टर रॅलीत सहभागी होऊन वरवंड ते चौफुला ट्रॅक्टर चालवणारी महिला ट्रॅक्टर चालक अंकिता बारवकर यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमात वासुदेव काळे, भाजप पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, माजी मंत्री बाळा भेगडे, हर्षवर्धन पाटील, अनिल बोंडे यांनी मनोगत व्यक्त केली.
या कार्यक्रमास भाजप किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष डॉ.अनिल बोंडे, आमदार राहुल कुल, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस वासुदेव काळे, आमदार सुजितसिंह ठाकूर, गणेश भेगडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळा भेगडे, मकरंद कोरडे, सुधीर दिवे, आनंदराव राऊत, धर्मेंद्र खांडरे, माऊली ताकवणे यांसह मान्यवर आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी:











































