नवी दिल्ली, १२ डिसेंबर २०२०: कृषी कायद्याविरोधात शेतकर्यांचे आंदोलन सोळाव्या दिवशीही सुरू होते. शनिवारी संतापलेल्या शेतकर्यांची निदर्शने सतराव्या दिवसात दाखल झाली आहेत. परंतु अजूनही त्यांची मागणी ठाम आहे. दिल्ली-जयपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थांबविण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिल्याने गोंधळ वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे हरियाणातील शेतकऱ्यांनी टोल प्लाझाला घेराव घालण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे गुरुग्राम आणि फरीदाबाद येथे पोलिस सज्ज आहेत आणि सुरक्षेची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे.
या सर्वात शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असताना दुसरीकडे सरकार हा कायदा मागे घेण्यास नकार देत आहे. वृत्तसंस्था एएनआय च्या मते, शेतकरी नेते बलबीरसिंग राजेवाल म्हणाले की, १२ डिसेंबर रोजी शेतकरी दिल्ली-जयपूर महामार्ग रोखतील. यावेळी शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांच्या घरांसमोर आणि भाजप नेत्यांच्या घरासमोर निषेध करतील, टोल प्लाझा देखील रोखले जातील. यादरम्यान रेल्वेसेवा जाम करण्याचा शेतकऱ्यांचा कोणताही हेतू नाही. मात्र, राजस्थान वरून देखील शेतकरी आंदोलन करण्यासाठी रवाना झाले आहेत
तथापि, दिल्लीला लागून असलेल्या सर्व सीमांवर शेतकरी संघटनांनी भारत बंदचा इशारा दिल्यानंतर गुरुग्रामचे जिल्हा दंडाधिकारी अमित खत्री यांनी आदेश जारी केले असून वेगवेगळ्या भागात ६० कर्तव्यदंडाधिकारी नेमण्याचे आदेश दिले आहेत.
गुरुग्राममध्ये जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या सिमा जाम करण्याच्या चेतावणी नंतर ६० ड्युटी मॅजिस्ट्रेट तैनात केले आहेत. जिल्हाभरातील विविध चौक-चौकांतून ते एनएच ४८ वर दंडाधिकारी पोलिस दलासह तैनात असतील. शहरातील सुरक्षा यंत्रणेला सांभाळण्यासाठी सुमारे दोन ते अडीच हजार पोलिस कार्यरत रहातील.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे













































