सणासुदीनंतरही भाज्यांचे दर भडकले मटारने गाठला २५० चा आकडा!

अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने आणि आवक लक्षणीयरीत्या घटल्यामुळे, सणासुदीनंतरही भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. पिंपरीतील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईमध्ये भाज्यांनी सामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लावली आहे. रोजच्या वापरातील भाज्या सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत.

बाजारात भाजीपाल्याची मोठी टंचाई निर्माण झाली असून, दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मटार प्रति किलो ₹२५० च्या विक्रमी दरावर पोहोचला आहे, तर मागील आठवड्यात ₹१८० ते ₹२०० असलेला दर आता थेट ₹२५० वर गेला आहे. याचप्रमाणे, गवार ₹१२०-₹१३० वरून ₹१५० ते ₹१६० वर, आणि शेवगा ₹१००-₹१२० वरून ₹१४० ते ₹१६० प्रति किलो दराने विकला जात आहे. लसूण देखील ₹१०० ते ₹१५० प्रति किलो दराने मिळत आहे. दोडका, कारली, भेंडी यांसारख्या फळभाज्यांचे दरही ₹५० ते ₹८० च्या दरम्यान आहेत.

पालेभाज्यांच्या दरातही वाढ झाली आहे; मेथीची जुडी ₹३० तर कोथिंबीर, शेपू आणि पालक यांची जुडी ₹२० पर्यंत पोहोचली आहे. बटाटा ₹२५ ते ₹३० आणि कांदा ₹२० ते ₹२५ अशा स्थिर किमतीवर आहेत. मात्र, टोमॅटो ₹२० ते ₹२५ आणि तोंडली ₹५० ते ₹६० या दराने मिळत आहेत, जो सामान्य नागरिकांसाठी थोडासा दिलासा आहे.

एकंदरीत, भाजीपाल्याच्या दरवाढीमुळे सामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडले असून, या परिस्थितीत दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत. आवक जोपर्यंत सुधारत नाही, तोपर्यंत भाज्यांचे हे वाढलेले दर कायम राहण्याची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे