आषाढी वारीत वारकऱ्यांच्या आरोग्याची ‘एफडीए’ घेणार विशेष काळजी; भेसळमुक्तीसाठी १२ पथके सज्ज!

25
Ashadhi Wari Food Safety Inspection
भेसळमुक्तीसाठी १२ पथके सज्ज;

Ashadhi Wari Food Safety Inspection: विठुनामाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) पूर्णपणे सज्ज झाले आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर, पालखी मार्गावर अन्न आणि पाण्याची कसून तपासणी करण्यासाठी एफडीएने १२ अन्न निरीक्षक पथके नियुक्त केली आहेत. देहू आणि आळंदी येथून निघणाऱ्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान कोणताही भेसळयुक्त अन्नपदार्थ, पाणी किंवा औषध वारकऱ्यांपर्यंत पोहोचू नये, यासाठी ही विशेष मोहीम राबवली जात आहे.

१८ जून रोजी देहूगावातून संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान करेल, तर १९ जूनला आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने निघेल. या विशाल सोहळ्यात लाखोंच्या संख्येने वारकरी सहभागी होतात. त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत, एफडीएची पथके रोटेशन पद्धतीने दररोज अन्न व पाण्याची तपासणी करणार आहेत. ही मोहीम केवळ पिंपरी-चिंचवडमध्येच नव्हे, तर इतर जिल्ह्यांमध्येही राबवली जाणार आहे, जेणेकरून संपूर्ण वारी मार्ग सुरक्षित राहील.

तपासणी यंत्रणा आणि प्रक्रिया वारकऱ्यांचे आरोग्य सर्वोच्च प्राधान्य;

एफडीएने पालखी मार्गावर स्वतंत्र अधिकारी नेमले असून, या संपूर्ण मोहिमेवर एफडीएचे सहआयुक्त सुरेश अन्नापुरे स्वतः लक्ष ठेवणार आहेत. “हॉटेल्स, हातगाड्या, रेस्टॉरंट्स, मुक्काम व थांबा स्थानांची कसून तपासणी केली जाईल,” असे अन्नापुरे यांनी सांगितले. अन्न परवाने, वापरलेले तेल, कच्चा माल, पिण्याचे पाणी, कॅनमधील पाणी, प्रसाद आणि अगदी औषधांचे नमुनेही तपासले जातील. चहा आणि पाणी वाटपाच्या ठिकाणी स्वच्छतेचे कठोर निर्देश दिले जातील.
पहिल्या टप्प्यात सहा अधिकारी दिवसभर तपासणी करतील आणि गरज पडल्यास अधिकाऱ्यांची संख्या वाढवली जाईल.

संशयित पदार्थांचे नमुने त्वरित घेऊन, तो माल तातडीने जप्त केला जाईल. एफडीएचा हा पुढाकार वारीला आरोग्यदायी आणि सुरक्षित बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या मोहिमेमुळे वारकरी निर्धास्तपणे विठ्ठलनामाचा गजर करत आपली वारी पूर्ण करू शकतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे