मुंबई, २९ सप्टेंबर २०२३ : मिळालेल्या माहितीनुसार, आज महाराष्ट्रात विविध ठिकाणी मान्सूनचा प्रभाव दिसणार आहे. हवामान खात्याने आज ठाणे, रायगड आणि रत्नागिरीमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला. मान्सूनच्या माघारीचा प्रवास सुरू झाला असून महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. अशा स्थितीत आता आज महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली.
मुंबई आणि मुंबई उपनगरांसह काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील. मुंबई, ठाणे, रायगड आणि कोकणच्या किनारपट्टी भागात गुरुवारीही पाऊस झाला. ठाणे जिल्ह्यासाठीही यलो अलर्ट जारी केलाय.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे, या आठवड्याच्या शेवटी पश्चिम बंगाल आणि ओडिशासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशातही पुढील दोन दिवस अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड










































