आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी- रत्नागिरी जिल्हाधिकारी – एम देवेंदर सिंह

रत्नागिरी २१ मार्च २०२४ : रोड शो करण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. दुचाकीला जास्तीत जास्त एक फूट बाय अर्धा फूट आकाराचा एकच ध्वज प्रदर्शित करण्याची परवानगी आहे. ३ चाकी, ४ चाकी वाहनांवर बॅनरला बंदी, आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, असे आवाहन करतानाच, आवश्यक परवाना न घेता लाऊडस्पीकरचा वापर करणारी वाहने जप्त केली जातील, असा इशाराही रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिला. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ आदर्श आचारसंहितेबाबत येथील अल्प बचत सभागृहात उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी, सर्व नोडल अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यांची आज बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे आदी उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार यांनी यावेळी आदर्श आचारसंहितेबाबत सविस्तर संगणकीय सादरीकरण केले. यामध्ये दुचाकीचा वापर, रोड शो बाबतची नियमावली, मिरवणुका आणि निवडणूक सभांमध्ये लाऊडस्पीकर, झेंड्यांचा वापर, तात्पुरते अभियान कार्यालय, एसएमएसचा गैरवापर रोखणे याबाबतचा समावेश होता. ते म्हणाले, स्थानिक कायदे, न्यायालयाचे आदेश किंवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशांच्या अधिन राहून रात्री १० ते सकाळी ६ यावेळेत निवडणूक प्रचारासाठी वापरली जाणारी पब्लिक ॲड्रेस सिस्टीम, लाऊडस्पीकर किंवा साऊंड ॲम्लीफायर चालवता येणार नाही. न्यायालयाचे आदेश आणि स्थानिक कायद्यांच्या आधीन राहून प्रमुख रुग्णालये, ट्रॉमा सेंटर, रक्तपेढ्या आणि प्रचंड गर्दीच्या बाजारपेठांमध्ये जाणारे मार्ग टाळून, शक्य असेल तेव्हा सुट्टीच्या दिवशी किंवा गर्दी नसलेल्या वेळेत रोड शो चे वेळापत्रक ठेवावे.

अपर जिल्हाधिकारी श्री. बर्गे यांनीही विविध नोडल अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, भयमुक्त आणि पारदर्शी वातावरण निवडणूक पार पडावी, यासाठी सर्वच अधिकाऱ्यांनी दक्ष रहायला हवे. विशेषत: आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होईल, यावर सुरुवातीपासूनच भर द्यावा. निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेले मार्गदर्शन, केलेले पत्रव्यवहार याविषयी सखोल अवलोकन करावे. दिलेल्या जबाबदारीची योग्यरितीने अंमलबजावणी करावी, असेही ते म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : केतन पिलणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा