महाराष्ट्र ठरला लसीकरणा मध्ये अवल

11

मुंबई, ७ मे २०२१: सध्या संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. याबरोबरच राज्यात देखील मोठ्या प्रमाणावर लसीकरण होत आहे. तर दुसरीकडे सर्वत्रच लसींच्या साठ्याचा मोठा तुटवडा जाणवत आहे. असं असतानादेखील महाराष्ट्र लसीकरणा मध्ये अव्वल ठरला आहे. यानुसार आजपर्यंत लसीकरण मोहिमेत १ कोटी ६७ लाख ८१ हजार ७१९ डोस देण्यात आले आहेत. राज्यातील २८ लाख ६६ हजार ६३१ नागरिकांना दोन्ही डोस देऊन त्यांना संरक्षित करण्यामध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे.

महाराष्ट्राने लसीकरणात सुरूवातीपासूनच आघाडी घेतली आहे. त्याच बरोबर लस वाया जाण्याचे महाराष्ट्राचे प्रमाण केवळ १ टक्के आहे. राज्यामध्ये आतापर्यंत १ कोटी ३९ लाख १५ हजार ८८ नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला तर २८ लाख ६६ हजार ६३१ नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून सर्वाधिक नागरिकांना दोन्ही डोस देणाऱ्या राज्यांमध्येही महाराष्ट्र पहिला असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

महाराष्ट्रापाठोपाठ राजस्थान (१ कोटी ३५ लाख ९७ हजार), गुजरात (१ कोटी ३२ लाख ३१ हजार), पश्चिम बंगाल (१ कोटी १४ लाख ७५ हजार), कर्नाटक (१ कोटी १ लाख ११ हजार) इतके लसीकरण झाले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे