महाराष्ट्राने लसीकरणात गाठला ५ कोटींचा टप्पा, उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राची ही विक्रमी कामगिरी

मुंबई, १७ ऑगस्ट २०२१: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आज सायंकाळी सहापर्यंत ६ लाख ८ हजार नागरिकांना लस देण्यात आली. त्यामुळे राज्यात या मोहिमेत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या ५ कोटींवर गेली आहे. देशभऱात उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे.
१४ ऑगस्ट रोजी राज्यात एकाच दिवशी ९ लाख ६४ हजार ४६० नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने आतापर्यंतची सर्वाधिक संख्या नोंदविली होती. काल झालेल्या लसीकरण सत्रांमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत ६ लाख ८ हजार नागरिकांचे लसीकरण झाले. रात्री उशिरापर्यंत त्यात वाढ होण्याची शक्यता आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी वर्तविली.
दरम्यान राज्यात काल, ४,१४५ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व नवीन ५,८११ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ६१,९५,७४४  रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात  एकूण ६२,४५२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता  ९६.८६% झाले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा