पाकिस्तानचा कट सुरक्षा दलांनी उधळला, पाच दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू काश्मीर १७ जून २०२३: भारतीय सैन्य दल आणि पोलिसांनी पाकिस्तानचा कट उधळून लावत पाच दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. या महिन्यात काश्मीर खोऱ्यात घुसखोरीचा हा दुसरा प्रयत्न होता. भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांना या कारवाईत मोठे यश मिळाले आहे.

भारतीय सैन्य दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी, शुक्रवारी १६ जूनला उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात, पाकिस्तानी दशतवाद्यांचा घुसखोरीचा कट उधळून लावला. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ हे दहशतवादी रात्रीच्या वेळी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यावर कारवाई करण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले आहे.

सैन्य दलाला उत्तर काश्मीर जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील जुमागुंड भागातील दहशतवाद्यांच्या कटाबाबत माहिती मिळाली होती. नियंत्रण रेषेवर सुरक्षा दलांनी ऑपरेशन सुरू केल्यानंतर शुक्रवारी सकाळी चकमक सुरू झाली. काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक, विजय कुमार यांनी ट्विटरवर याची माहिती दिली. चकमकीत पाच दहशतवादी मारले गेले व इतरांचा परिसरात शोध सुरू असल्याचे यात म्हंटले आहे.

या दहशतवादी कारवाईबाबत माहिती देताना जनरल गिरीश कालिया यांनी सांगितलं की, हे यशस्वी गुप्तचर ऑपरेशन भारतीय लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिस यांच्यातील समन्वयाचे आणखी एक उदाहरण आहे. लष्कर आणि पोलीस दलाकडून काश्मीरमधील शांतता भंग करण्याचा शत्रूचा हेतू हाणून पाडण्यासाठी प्रयत्नशील आणि कटिबद्ध आहेत.

नियंत्रण रेषेपलीकडून दहशतवाद्यांच्या संभाव्य घुसखोरीबाबत विविध गुप्तचर संस्थांकडून मोठ्या प्रमाणात माहिती मिळाली होती. त्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. घुसखोरी करणारे दहशतवादी कोणत्या संघटनेचे आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दहशतवाद्यांची ओळख आणि त्यांच्या कोणत्या संघटनेची संबंध आहे, याबाबत तपास सुरु असल्याचे जनरल गिरीश कालिया यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा