लॉकडाऊनच्या काळातल्या वाढीव वीजबिलांबाबत दिवाळीपर्यंत निर्णय घेण्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे सूतोवाच

मुंबई, ३ नोव्हेंबर २०२० : लॉकडाऊनच्या कालावधीत जास्तीच्या वीजवापरामुळे आलेल्या वाढीव वीजबिलांबाबत दिलासा देण्याबाबत चर्चा सुरु असून दिवाळीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे, असं ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. राऊत यांनी काल ट्रॉम्बे इथल्या टाटा औष्णिक वीज निर्मिती केंद्राला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मुंबईसाठी खात्रीशीर आणि दर्जेदाररित्या वीज कशी उपलब्ध करता येईल या दृष्टीनं प्रयत्नशील असून वीजपुरवठा खंडित होण्याची १२ ऑक्टोबरसारखी घटना पुन्हा घडू नये यासाठी महापारेषण, एसएलडीसी, टाटा पॉवर कंपनी आणि अदानी एनर्जी कंपनी यांच्यात समन्वय साधण्याची कार्यक्षम संदेशवहन आणि समन्वय व्यवस्था निर्माण करण्याचे निर्देश दिले आहेत, असेही ऊर्जामंत्री म्हणाले. आयलँडिंग यंत्रणा सफल होण्यासाठी वीज नियामक आयोगाकडे आवश्यक उपाययोजनांचा प्रस्ताव सादर करण्यात येईल, असंही डॉ. राऊत यावेळी म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी