नवी दिल्ली, २४ जुलै २०२३ : पावसामुळे यमुनेच्या पाण्यानी पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडली आहे. २०५.३३ मीटर ही धोकादायक पातळी पार करत, सोमवारी सकाळी यमुनेने २०६ मीटरच्यावर वाहायला सुरुवात केलीय. यामुळे दिल्लीत पुन्हा एकदा पूर येण्याची परिस्थिती निर्माण झालीय.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांच्याशी चर्चा केलीय. पूर परिस्थितीला सामोरे जाण्याच्या तयारीवर दोघांमध्ये चर्चा झाली. याबाबत शहा म्हणाले की, आपत्कालीन परिस्थिती मध्ये एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीम लोकांच्या मदतीसाठी अलर्ट आहेत. सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या गेल्यात. हरियाणातील हथिनी कुंडातून पाणी सोडल्यानंतर यमुनेची पाणीपातळी वाढलीय.
शनिवारी संध्याकाळी पाण्याची पातळी २०५.०९ मीटर होती, ती रविवारी सकाळी २०६.०१ मीटरवर पोहोचली. दिल्लीतील जुन्या रेल्वे पुलाजवळ यमुनेच्या पाण्याची पातळी गेल्या काही तासात एक मीटरने वाढलीय. दहा दिवसांखाली १३ जुलैला, यमुनेच्या पाण्याची पातळी रेकॉर्ड ब्रेक २०८.६६ मीटर झाली होती. त्यामुळे पुराचे पाणी लाल किल्ला, राजघाट आणि दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले होते.
न्युज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे