भाजप सोबत समझोता करणार नाही ठरवल्यावर माझ्यावर केंद्रीय यंत्रणाचा छापा अनिल देशमुख

नागपूर, २१ ऑगस्ट २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडल्यानंतर दोन्ही गटाच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे चालू आहे. एक गट अजित पवार सोबत आहे तर दुसरा गट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सोबत आहे. त्यातच आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सरळ भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. भाजपसोबत तडजोड करण्यासाठी माझ्यावरही दबाव होता. पण, मी तडजोड करण्यास नकार दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माझ्यावर धाड पडली असल्याचे अनिल देशमुख म्हणाले.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या कारवाई बाबत माहिती देताना देशमुख म्हणाले की, शरद पवारसाहेब पुण्यातील एका कार्यक्रमात बोलले होते, की राष्ट्रवादी मधले काही नेते ईडीच्या भीतीने भाजपात गेले. त्यात माझ्याही नावाचा उल्लेख केला होता, ते खरं आहे. माझ्यावरही भाजपकडून समझोता करण्यासाठी दबाव होता. पण मी सरळ सांगितलं समझोता करणार नाही, आणि लगेच दुसऱ्याच दिवशी माझ्यावर धाड पडली. परमबीर सिंह यांना माझ्यावर खोटे आरोप करण्यास सांगितलं आणि माझ्यावर कारवाई करण्यात आली. तसेच मी समझोता केला असता तर माझ्यावर कारवाई झाली नसती.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवरही अनिल देशमुख यांनी भाष्य केले आहे, ते म्हणाले सर्वांनाच माहित आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात स्वबळावर सत्ता आणू शकत नाही. दिलीप वळसे पाटील यांनी अनेक वर्षे पवारसाहेब यांच्याबाबत काम केले, त्यांनी तारतम्य बाळगायला हवे. नाही तर त्यांच्या जिल्ह्यातील लोक त्यांना धडा शिकवतील, असं देशमुख म्हणाले.

पुण्यातील कार्यक्रमात शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील भाजपात गेलेल्या नेत्यांवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, अलीकडेच आमचे काही लोक सरकारमध्ये सामील झाले आहेत, ते विकासाच्या मुद्द्यावर आम्ही गेलो असं ते सांगत आहे. पण त्याला फारसा अर्थ नाही. त्यापैकी काही ईडीच्या चौकशीत होते. तर काहींना तपासाला सामोरे जाणे ठीक वाटलं नाही, तर अनिल देशमुख यांच्यासारख्या काहींनी तुरुंगात जाणं पसंत केलं. अनिल देशमुख तुरुंगात गेले आणि १४ महिने तुरुंगात घालवले. तिथे त्यांना तपास टाळण्यासाठी भाजपमध्ये सामील होण्याची देखील ऑफर देण्यात आली होती, पण मी कोणताही गुन्हा केला नाही. मी कायद्याला सामोरा जाणार, पण आपली विचारधारा सोडणार नाही, असं त्यांनी सांगितलं. तर दुसरीकडे आमच्या काही सदस्यांनी तपास यंत्रणांच्या दबावाखाली सरकारमध्ये प्रवेश केला, असं शरद पवार म्हणालेले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा